उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रा दौऱ्यात नाशिकमध्ये आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची घोषणा केली आहे. मागील वर्षी खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ही रक्कम येत्या 31 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
पिक विमा संदर्भात आगामी बैठक
धनंजय मुंडे यांनी जाहीर केले की पिक विमा व इतर कृषी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत एक बैठक होणार आहे. या बैठकीत पिकविमा कंपनीचे अधिकारी, खासदार छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित असतील. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रलंबित विमा प्रश्नावर चर्चा होईल.
प्रलंबित विम्याच्या प्रश्नावर तातडीने कृती
काल धनंजय मुंडे यांनी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी प्रलंबित विम्याच्या मुद्द्याकडे त्यांचे लक्ष वेधले. या प्रश्नावर तातडीने कारवाई करण्यासाठी आज सकाळी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. बैठकीत आमदार हिरामण खोसकर आणि माजी आमदार जयंत जाधव उपस्थित होते.
853 कोटी रुपये विमा रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात
धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग व उत्पन्नात घट झाल्यामुळे 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित असल्याची माहिती मिळाली. यावर तातडीने कारवाई करत, त्यांनी कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क साधला आणि शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले. कंपनीनेही धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार 31 ऑगस्टपर्यंत ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील जवळपास सर्व 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत
गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. या शेतकऱ्यांना 21 दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे 79 कोटी रुपये विमा रक्कम मिळाली होती. तसेच, स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान यासाठी 25 कोटी 89 लाख रुपये मंजूर झाले होते. त्याची वाटप प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता, धनंजय मुंडे यांच्या तातडीच्या कृतीमुळे 853 कोटी रुपये विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे, जे त्यांच्यासाठी मोठी आर्थिक मदत ठरेल.
हे ही वाचा – Vinesh Phogat Retires : विनेशच्या निवृत्तीने कुस्ती विश्वात खळबळ – ‘तू हरली नाहीस, तुला…’